पालघर : सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी उत्पादनवाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्याबद्दल, डहाणू तालुक्यातील नरपड गावचे देवेंद्र राऊत व वडदे गावचे बाळकृष्ण पऱ्हाड या दोन शेतकऱ्यांना सर्वसाधारण गटातील ‘वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ जुलै रोजी त्यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत २८ जुलै रोजी या दोन प्रगतिशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र आणि शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, स्थायी समितीचे सभापती अशोक वडे, सभापती सुरेश तारे, सभापती धर्म गोवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेजुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवऋषी, स्थायी समिती सचिव, सर्व सदस्य आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.